कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Friday, December 31, 2010

२०११-नवी आव्हानं???

३१ डिसेंबर.
सरत्या वर्षाचा शेवट आणि इंग्लिश वर्षाची सुरुवात.२०१० हे वर्ष तसं तर मोठमोठ्या आर्थिक उलाढालीचं आणि राजकीय घोटाळ्याचं.काहीशी चांगली कामगिरी वगळता देशातील परिस्थिती एकंदरीतच असंतोषाची.सामान्य माणसावर पडणारा महागाईचा ताण आणि नेते लोकांचा मात्र "आदर्शवाद".कुणी क्रिकेटमध्ये गुंतलेले तर कुणी राष्ट्रीय खेळातील मैदानावरीलच माती खाणारे.देशाच्या रथाची दोर यांच्या हातात पण त्यांनी ती दोर आपल्या घराच्या अंगणात बांधून विदेशवारी करण्यातच निपुण्य मिळवलंय.ज्या मंडळींवर देश चालवण्याची जबाबदारी आहे तेच लोकं देशाला पोखरायला निघालेय.सामान्य माणसाला त्याचं घरंच नीट चालवता येत नाही त्यात देशाचं काय?
महागाईचा भस्मासुर एवढा वाढतोय की त्याला आवरायला पुन: भगवंताला प्रकट रुपात पृथ्वीवर यावे लागेल असे वाटते कारण ते काही या सत्ताधारी मानवांचे काम दिसत नाही.असो.जोपर्यंत राजकारणी लोकं हव्यासापोटी जगणं सोडणार नाही तोवर सामान्य माणसांचे हाल निश्चित आहे.

२०१०.व्यक्तिगतरीत्या मागे वळून पाहताना भरपूर अश्या गोष्टी किंबहुना घडामोडी आहेत ज्या पुन: आयुष्यात घडाव्यात असे काही वाटत नाही.काहीश्या गोड, काहीश्या आंबट आणि काही काही तर तुरटही अश्या गोष्टी आणि अनुभव प्रामुख्याने या सरत्या वर्षात बघायला मिळाल्या.त्याच गोष्टींच्या काही आठवणी तर काही साठवणी मनात कुठेतरी रुजून असतात.हे तर जीवनात येत-जात राहतातच पण २०१० मध्ये जरा जास्तच होत्या.

२०११.नवीन वर्ष म्हटलं की नवी आव्हानं.त्या आव्हानांना पेलण्यासाठी पुन: नव्याने बांधणी,नवी तडजोड आणि त्यातच "माझे रिझोल्युशन" हे प्रत्येकाच्याच मनात असलेलं काहीतरी गुपित असतं.मी नेहमी काहीतरी रिझोल्युशन ठरवतो पण परिस्थिती नेहमीच त्याच्या विरुद्ध असते.त्याकारणाने माझे रिझोल्युशन हे दरवर्षी मोडीतच येतं.बघूया या वर्षी काय होतं ते.

हे वर्ष निदान माझ्यासाठी तरी काही सोन्याचं नव्हतं राव.परमेश्वर करो की येणारं वर्ष माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक जीविताच्या आयुष्यात सुख-समाधानाची भरभराट घेऊन येवो.सर्व रसिक प्रेक्षकांना नव-वर्षाच्या हार्दिक शुबेच्छा...............!!!

Friday, December 3, 2010

रंगमंच

आज लेखणीतील शाई संपली आहे,

दरवेळेचं नाटक आहे.

टायपिंगचा कंटाळा आल्यावर जर काही लिहायला गेलं

तर नेमकी शाई नाही.

आता काय लिहिणार कपाळ........

मनातील जे भाव आज कागदावर उतरवायचे होते

ते मनातच राहून गेले.

पुन्हा गुंतले ते आत,आणखी आत.

कधी पुन्हा इच्छा होईल,

कधी हातात लेखणी येईल

आणि आलीच तर त्यात शाई राहणार की नाही,

हे आगाऊचे प्रश्न निर्माण झाले.

रंगमंचावर सुद्धा कधी कधी असेच होते.

शाई भरलेला कागद मनात असतो.

शाईने रंगलेल्या शब्दांना आपल्या भावनेने सजवून

प्रेक्षकांपुढे त्याचे सादरीकरण करायचे असते.

पण कधीतरी हे सादरीकरण भावनाविरहित होते

कारण मनातील शब्दांची अन त्या शाईने रंगलेल्या शब्दांची

गट्टीच जमत नाही.

मनाच्या शाईचा रंग अन शब्दांच्या शाईचे मिश्रण होत नाही.

शब्दांच्या तारेवर कसरत करणे म्हणजे रंगमंच नव्हे,

ती कसरत हजारो लोकांच्या देखत दिमाखात सादर करणे

हे खऱ्या प्रतिभावंताचे काम होय.

आज मीच रंगमंच गाजवणार,

सूर्यासारखा मीच तळपणार,

याच ध्येयाने रंगमचावर ओठांतून जणू शाईचे सडे सांडतात.

तेच सडे कुणी ओंजळीत घेत माथी लावतात

तर कुणी पायाखाली तुडवून निघून जातात.....................!!!