कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....
Friday, December 31, 2010
२०११-नवी आव्हानं???
Friday, December 3, 2010
रंगमंच
आज लेखणीतील शाई संपली आहे,
दरवेळेचं नाटक आहे.
टायपिंगचा कंटाळा आल्यावर जर काही लिहायला गेलं
तर नेमकी शाई नाही.
आता काय लिहिणार कपाळ........
मनातील जे भाव आज कागदावर उतरवायचे होते
ते मनातच राहून गेले.
पुन्हा गुंतले ते आत,आणखी आत.
कधी पुन्हा इच्छा होईल,
कधी हातात लेखणी येईल
आणि आलीच तर त्यात शाई राहणार की नाही,
हे आगाऊचे प्रश्न निर्माण झाले.
रंगमंचावर सुद्धा कधी कधी असेच होते.
शाई भरलेला कागद मनात असतो.
शाईने रंगलेल्या शब्दांना आपल्या भावनेने सजवून
प्रेक्षकांपुढे त्याचे सादरीकरण करायचे असते.
पण कधीतरी हे सादरीकरण भावनाविरहित होते
कारण मनातील शब्दांची अन त्या शाईने रंगलेल्या शब्दांची
गट्टीच जमत नाही.
मनाच्या शाईचा रंग अन शब्दांच्या शाईचे मिश्रण होत नाही.
शब्दांच्या तारेवर कसरत करणे म्हणजे रंगमंच नव्हे,
ती कसरत हजारो लोकांच्या देखत दिमाखात सादर करणे
हे खऱ्या प्रतिभावंताचे काम होय.
आज मीच रंगमंच गाजवणार,
सूर्यासारखा मीच तळपणार,
याच ध्येयाने रंगमचावर ओठांतून जणू शाईचे सडे सांडतात.
तेच सडे कुणी ओंजळीत घेत माथी लावतात
तर कुणी पायाखाली तुडवून निघून जातात.....................!!!