कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Sunday, October 31, 2010

माझा एक प्रांजळ प्रश्न????


आज लिहिण्याची इच्छा होती पण विषय नव्हता.मग बघावं साठवणीतून आठवणी भेटतात का?एक परवाचाच विषय स्मरणात आला.विषय असा......
भारत संचार निगम लि.च्या वतीने दिवाळीनिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोफत ऑनलाईन सुविधा देण्यात आली.ही सुविधा पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्या गोवा शाखेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

त्या संबंधी एका मुलीने मला फोन केला.
"सर मी BSNL मधनं बोलते आहे ,जर तुमच्याजवळ थोडा वेळ असेल तर मी बोलू शकते?"
बोला.
"सर आमच्याकडे दिवाळीनिमित्त एक ऑफर आहे"
कश्याबद्दल.{मी थोडे कष्ट घेऊनच बोलत होतो.}
"एक नवीन गेमिंग झोन आलाय एकदम फ्री"
एकदम फ्री.
"हो पण एक महिन्यासाठी".
त्यानंतर.
"आपल्याला सबक्रीप्शन वाढवून घ्यावे लागेल,त्याचे चार्जेस वेगळे लागतील."
नको नको.ह्या फालतू भानगडी नको.
"सर ऐकून तर घ्या.अपलोड करा आणि मग एक महिन्याआधी रद्द करा ना."
तीच कामं आहेत का?
"सर प्लीज ट्राय तर करा."प्लीज........
"हवं तर उद्या रद्द करा पण.........

हे साधारण पाच मि.चे बोलणे.पण त्या पाच मिनिटांच्या बोलण्यानेच मी भाळून गेलो.तिचा प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि नाही म्हणता म्हणता मी गेमिंग झोन अपलोड करायला राजी झालो.

तिचा आवाज इतका गोड होता की तिला ऐकतच राहावे.मग गेमिंग झोन अपलोड करण्याची प्रोसेस सुरू झाली.
"सर पहिले BSNL ची वेबसाईट ओपन करा."
एक मि.तू मला हे सर म्हणणं आधी थांबव.
"ओके सर."
अरे पुन्हा.......
"नाही नाही सॉरी."
आत्ता बोल.साधारण किती वेळ लागेल याला.
"तुमच्या नेट स्पीड वर अवलंबून आहे."
तरी.
"कुठे कुठे पंधरा मि.तर कुठे एक तास सुद्धा लागतो."
अरे व्वा मला एक तासच हवा होता.{मि मनात म्हटले.}
मग अपलोडिंग करता करता इकडचे-तिकडचे प्रश्न मी तिला विचारू लागलो आणि तीसुद्धा छान रित्या{प्रेमाने}
त्यांची उत्तरे देत होती.
बोलता बोलता लक्षात आलं.......अर्रे आपण तर इचे नाव विचारलेच नाही.

तुझं नाव काय गं?मी म्हणालो.
"अदा."
तुम्ही कधी खरं बोलला का?
"नाही रे खर्रच."
आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असं नाव ठेवतात का?
"मी मुस्लीम आहे."
काय?
"हो त्यात नवल काय?"
नाही नवल नाही काही.पण इतकं सुंदर मराठी कसं काय बोलतेस?
"मी चिपळूणची...............जन्मापासून"
अच्छा.म्हणजे तू खरी कोंकणी तर..........
"होय."
मग गोव्यात?
"अरे शिक्षण चालु आहे आणि पार्ट टाईम जॉब."
"झालाय का अपलोड?"तिने अचानक विचारलं.
मी एकदम थबकलो.नाही थोडं व्हायचंय.का तुला घाई आहे का?
"मला कसली घाई?माझा जॉबच आहे तो."
मग कितीही वेळ बोललं तर चालतं का?
"हो पैसे BSNL चं देतो ना!"
असं संभाषण कमीत कमी मी पाऊण ते एक तास चालवलं......................
तिच्याशी बोलणं सोडण्याची infact तोडण्याची इछाच नव्हती.
माहीत नाही का बरं?पण कदाचित मी तिच्या बोलण्याच्या प्रेमात पडलो होतो.
खूप सुंदर बोलायची ती.
मग नकळत मी तिला म्हणालो.झालं अपलोड आत्ता काय?
"आत्ता काही नाही एन्जोय......."
"आणि जर तुम्हाला सबक्रीप्शन रद्द करायचं असेल तर आमचा टोल फ्री नं.दिला आहे,त्यावर फोन करायचा."
फोन केल्यावर तूच भेटशील ना?
माझा एक प्रांजळ प्रश्न.
"नाही रे.इथे भरपूर एम्पलोइज आहेत.कोणीही भेटू शकतं."बाय......य्य्य्यय्य्य्य.........
तिचं मिश्कील उत्तर.......................

Thursday, October 28, 2010

नंदिनी............एक गोंडस फुल


ssssss...........चल उठ,

बघ सकाळ झाली,सूर्य डोक्यावर येतोय.

अगं उठ ना............

अभि,झोपु दे ना.............फक्त पाच मि.

तुझी पाच मि.माहित आहे मला.दोन तासांनी उठशील तु.

ते काही नाही चल उठ.

असा रे काय करतोस,

अगं आज दिवाळी आहे नंदू.........

ते मला माहित नाही,

आज आपण सुटीवर आहोत बस्स,

आणि मला झोपायचं आहे.

तु अशी काही ऐकायची नाही,थांब............

ए नको, अभि नको, मी उठतेय,

भिषेक.....sssssssss...............

नालायाका पाणी किती गार होतं!

निदान गरम तरी आणायचं.

उठ ना जानू आज दिवाळीचा पहिला दिवस आहे.

उद्या झोपून राहा.

आपण जर आपल्या घरी,आपल्या देशात असतो

तर आईने मारून उठवलं असतं.

ए हो............ओsssss.........ओssssss कित्ती मजा यायची.

सकाळी आई लवकर उठवायची,

अं..sssssss.......... अंघोळ आणि मग औक्षण वगैरे............

आणि नवीन कपडे.

हो तुझा तो नेहमीचा बावळट ड्रेस,

एकच एक शेरवानी...........

तेव्हा मला बाबांचंच ऐकायला लागायचं......

ते म्हणतील तेच व्हायचं.

....................आणि आत्ता मी म्हणील ते!

पण तु त्या शेरवानीमध्ये खरंच बावळट दिसायचास.

तु मात्र तेव्हा सलवार सूटमध्ये फार सुंदर दिसायची,

आणि आजही दिसतेस.

अं..ssssss.........

पुरे........ पुरे.सकाळी सकाळी जरा जास्तच रोमांटीक होतोय.

चल मला फ्रेश होऊ दे.

खूप कामं पडलीय.

आज तुझी ती मिस.मेरी येणार नाही,

सगळी कामं तुलाच करायची आहेत.............

नालायक लाज नाही वाटत मला कामं सांगायला?

त्यात लाज वाटण्यासारखं काय एवढं?

मी अंघोळीला जाते तोवर झाडांना पाणी घाल.

sss मी येऊ का..............?

हट चावट कुठला.......

नंदिनी..............नंदिनी..............नंदू.............

हो हो आले.......थांब.

अगं मिसेस केल्विन आली आहे.लवकर ये.

हो हो आले.................कुठे आहे मिसेस केल्विन?

कुठे आहे?

तेच तर मी विचारतेय...........

अं ह...........ती आलीच नाही.

मला तुझं न्हाऊन निघालेलं रूप बघायचं होतं.

पाण्याच्या थेम्बाने न्हाऊन निघालेला चेहरा पाणावलेल्या पापण्या आणि .........

बस्स ...............पुरे .

हलकट मी कित्ती घाईघाईत आली.

कंडीशनरसुद्धा लावलं नाही.

ठीक आहे ना ,रागावातेस कशाला?

चल मी लाऊन देतो.

भलत्याच वेळेस मस्करी नको.

चल ना ..........

ए सोड.

अं sssssssss...................................

आता झालं...................... भेटलं जे हवं होतं.जाऊ दे

नाही नं.........

आता तु मार खाशील.

लवकर तयार हो.आपल्याला बाजारात जायचंय.

शहाणपणा करू नको.एवढी भाजी तर पडलीय घरात...........

तुला सकाळी सकाळी ड्रायव्हिंगचा मूड आहे ते सांग?

अगदी बरोबर !

मस्त वातावरण आहे,माझी कार वाऱ्याशी बोलेले आज ...........

हो........ओsssss................ओssssssss.

आणि माझे हात तुझ्या गालाशी.

काय ?

काही नाही चल.पण तु नीट कार चालव.

वृम वृम..................वृम.........................................

नंदू कार स्लो घे,पुढे लक्ष दे,ब्रेकवर कायम पाय ठेव,

स्लो घे,स्लो म्हणतोय ना.............

ए चुप्प...........

उतर आत्ताच्या आत्ता.

दोन मि.शांत नाही राहू शकत........?

सारखी बडबड करतोय.

अगं पण तु...........

तु नाही आणि मी नाही,यायचं असेल तर शांत बस.

ठीक आहे....ए sss......एsss...........चल लवकर.

मला घरी पोहचल्यावर उद्याच्या प्रेझेनटेशन ची तयारी

करायची आहे,नाहीतर तो रॉडीक खाऊन टाकेल मला...............

काय सारखा घाबरतोस त्या रेड्याला ?

सांगून टाक नाही देणार प्रेझेनटेशन .........

व्वा.....आणि मी घरी बसू.

हो.मिस मेरी आहे की तुझ्या सोबतीला,

आणि मी कामावर असताना हरकत काय?

मार्केट आलंय,त्या पलीकडे पार्क कर

आणि फुकटची बडबड बंद कर.

अगं सरळ कुठ जातेय..............?

आपण मार्केट नंतर येताना करणार आहोत,

पहिले आपण गोर्डन हिल्स वरनं एक लाँग...............

नंदू तु पागल झाली आहे........

गोर्डन हिल्सवर बर्रीकेड नाहीत.....

हो .......हो माहित आहे मला .......मी हळू नेते.

नंदिनी कुठल्याही एका साइडने घे कार.

रस्त्याच्या मधोमध नको.

बघ बघ सांभाळ समोरून कार येतेय.......

कित्ती घाबरट आहेस तु !

ये जरा जवळ सरकून बस...........ये ना ...........

फालतू चाले करू नकोस....समोर लक्ष दे.

अगं तो मुलगा................

किती छान आहे ना ...........मी थोडी वेगाने घेते.

नंदू स्पीड कमी कर.

थांब ना ,बघ छान हवा वाहतेय.

समोर टर्निंग आहे......स्लो कर.

बघ ती कार..

अरे अभि अचानक ब्रेक लागत नाहीया......

नंदिनी गंमत पुरे.समोर स्कूल बस आहे.

नाही रे खरंच स्पीड कमी होत नाही...........

नंदू स्पीड कमी कर............समोर ते मुलं..........

स्टेअरिंग तिकडे फिरव.......

अगं डावीकडे......

ब्रेक पूर्ण कसून दाब.........

नंदिनी.......

अभि.............. नाही होत आहे.........

नंदिनी ते मुलं...........

नंदिनी ...........

अभि.............अभि...........

नंदिनी....................नं...............दि.................

नंदिनी .....ईssss.......ईsss.............ईssss..............????

नंदिनी.

माझं गोंडस फुल.माझ्यापेक्षा पाच महिन्यांनी मोठी पण पाच वर्षांनी लहान वाटते आणि वागतेसुद्धा.नेहमी हसणारी आणि हसवणारी.खोडकर,तापट पण खूप प्रेम करणारी,माझी पत्नी नंदिनी.

नंदू {मी तिला लाडाने नंदू म्हणायचो}आणि मी,लहानपणापासूनचे सोबती.तेव्हापासूनच माझ्या मनात तिच्याप्रती ओढ असायची.एक वेगळाच बंध निर्माण झाला होता.दहावीपर्यंत आम्ही शेजारी-शेजारीच होतो.मग स्वत:च्या घरी राहायला गेलो,त्यामुळे ती जवळीक तुटली.पण फोनवर बोलणे आणि बाहेर भेटणे व्हायचेच कारण आमचा फ्रेंडग्रुप एकचं होता.ते एकमेकांच्या नावाने आम्हाला चिडवायचे सुद्धा,पण तिच्या मनाने अजून मला साद नव्हती दिली आणि माझे मन तर तिच्यामध्ये आकंठ बुडाले होते.मीच कधी विचारले नाही तर ती तरी होकार कसा दर्शवणार.

आमचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आणि ती विज्ञान शाखेची.तिला शिकण्याची खूप आवड.जीवनामध्ये काहीतरी नवीन करण्याची तिची सतत धडपड.त्याच धुंदीत ती अमेरिकेला गेली,उच्च शिक्षणासाठी.जाताना मला बोलूनही गेली पण तरीही अबोल.निघून गेली ती दोन वर्षासाठी दूर साता समुद्रापार.

मी इकडे तिच्यावाचून एकटा.अस्वस्थ,बेचैन.फक्त एकच इच्छा तिला पाहण्याची,भेटण्याची.तसं नेटवर बोलणे व्हायचे अधून-मधून.तरीही तिची जवळीक काही वेगळीच.पाहता पाहता तीन महिने निघून गेले.ती तिच्या कॉलेजमध्ये रमली पण माझं इकडे काही मन लागेना.शेवटी ठरवलं जायचं अमेरिकेला.TOFFEL चं कोचिंग चालू केलं.दोन अटेम्त वाया गेले.पण तिसऱ्या मध्ये सुदैवाने निघालो.मुलगा शिकण्यासाठी एवढे पराक्रम करतोय हे बघून घरच्यांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव केली आणि मी "MASTER IN ACCOUNTING MANAGEMENT”च्या कोर्स साठी एकदाचे अमेरिकन विद्यापीठ गाठले.

अठरा तासांच्या दीर्घ प्रवासानंतर शेवटी आमचं विमान अमेरिकन विमानतळावर उतरलं.सगळ्या कागदोपत्री विधी आटोपून आम्ही म्हणजे माझ्यासोबत आणखी दोघेजण होते,बाहेर आलो.

अमेरिका खरचं स्वप्नातील देश.सगळ्या अत्त्याधुनिक सुखसोई,गगनचुंबी इमारती,विशाल रस्ते हे सगळं बघून मी तर हरपून गेलो.थोड्याच वेळात आमच्या कॉलेजची गाडी आम्हाला न्यायला आली.साधारण दोन-अडीच तासानंतर आम्ही होस्टेलवर पोहोचलो.रूमची व्यवस्था ठीक होती.कॉलेज सुरु व्हायला तीन दिवस शिल्लक होते.या वेळात लवकरात लवकर नंदूला भेटून घ्यावे अशी इच्छा होती.

मी फ्रेश झालो.थोडा आराम आणि खाणं-पिणं झाल्यावर जवळच्या नेट कॅफेवर गेलो आणि नंदूला स्क्राप करून तिचा सेल नं.मागितला.मग होस्टेलला परत येऊन आम्ही तेथील सुव्यवस्थेचा आढावा घेतला.लवकरच तेथे आमचे दोन-तीन मित्र जमले.सगळं काही एका स्वप्नासारखं वाटत होतं.स्वदेश ते विदेश माझ्यासाठी इतकं लवकर घडलं की मुंबई-पुणे म्हणण्याइतकं,पण प्रत्यक्षात मात्र फार कठीण.ती TOFFEL ची तयारी आणि परीक्षा देता देता तर माझ्या नाकी नऊ आले होते.अश्याच काही आंबट-गोड आठवणीमध्ये गुंतत मी झोपी गेलो.

अमेरिकेची सुंदर पहाट आणि त्यात मला नंदूच्या सेल नं ची वाट.माझ्याच रुममध्ये असणाऱ्या स्टिफनच्या लैपटोपवर मी माझा मेल चेक केला.नंदुनी सेल नं.पाठविला होता आणि सोबत लिहिले होते की "नं.तर असा मागतो आहे की आत्ता ISD CALL करणार आहे."तिला मी इथे येण्याबाबद काहीच माहिती नव्हते.

मी लगेच तिला तिथल्या PCO तून फोन केला,माझा आवाज तिथल्या लोकल नं,वरून ऐकून तिचा तर विश्वासच बसेना.खूप काही बोलल्यानंतर मी तिला भेटण्यासाठी बोलावले.ते त्या दिवशी शक्य नव्हते कारण तिच्या ठिकाणापासून माझे होस्टेल फार दूर होते.आम्ही दुसऱ्या दिवशी भेटण्याचे ठरविले.त्या रात्री मला झोपच लागली नाही.माझे मन तिला भेटण्यासाठी आतुर झाले होते.जवळ-जवळ एक-दीड वर्षानंतर आम्ही भेटणार होतो.मला तिथलं काहीच माहिती नसल्यामुळे माझ्या कॉलेज जवळच भेटायचं ठरलं होतं.मी तिथे आधीपासूनच हजर होतो.दीड तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ती आली.हळूहळू,मंद गतीने चालत माझ्या जवळ आली आणि पटकन तिने मला मिठीत घेतले.एका संथ पण ज्वलंत कृतीने मी भारावून गेलो.मला तर गहिवरल्या सारखे झाले.तोंडातन शब्दच फुटेना.कित्ती कित्ती दिवसांनी आम्ही भेटलो होतो.

किती दिवसापासून मी तुझी वाट बघतेय आणि तु आज येतोय,ती म्हणाली.

तिच्या या वाक्याने मी थबकून गेलो.

पण तु तर कधी बोलली नाहीस,मी म्हणालो.

प्रेम हे बोलण्यातूनच प्रकट व्हायला हवं का?

लहानपणापासूनच माझं प्रेम होतं तुझ्यावर पण वाटलं तु कधीतरी बोलशील.

आणि मी जर इथे आलो नसतो तर...........

मी तर येणारच होते ना !

झालं शेवटी जे व्हायचं.आम्ही एकत्र आलो.

तिला तिथेच एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि विसा ही वाढवून मिळाला.

मग आम्ही काही दिवसांसाठी अमेरिकेतच वास्तव्यास होतो....................


त्या जीवघेण्या अपघाताने माझ्या आयुष्याची माती झाली. होतं नव्हतं सगळं गमावून बसलो.आज तिच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी पुन्हा ते सारे क्षण जागे झाले जे मी आजवर मनात मारून ठेवले होते.मी गमावून बसलो नंदूला आणि आमच्या फुलाला.

तीन महिन्यांची गरोदर होती ती .......................

Wednesday, October 27, 2010

निसर्ग

सडे सांडले किरणांचे
वरुणालाही जाग आली
मेघ गडगडले सारे
इंद्रधनुला साज आली

निसर्ग आला बहरून
कोकिळेची तान आली
काहुरल्या अतृप्त जीवा
तृप्त करण्या गंगा आली

फुलं-पाने उधळून न्हाले
रानवाटचे फुलोरे झाले
निर्मळ झाले क्षण सारे
गार वाहती आज वारे

संध्या ही फुलली प्रेमाने
आलिया नित्य नेमाने
शमले आता जीव सारे
भीती कसली रातीची रे

क्षितिजावरती किरणांचा
ओझरला रंग आता
चिमण्यांनीही धरल्या
अपुल्या घरच्या वाटा

तारका जाग्या झाल्या
चंद्रालाही जाग आली
निस्तेज होऊन सूर्याने मग
सोडली ती लाल लाली

पावसाळा

पावसाळा.
पावसाळा म्हटला की चिंब ओलं होऊन निसर्गातील या अप्रतिम ऋतुचा आनंद घेण्याची मजा प्रत्येकाच्याच मनी असते.पाऊस म्हणजे मनातील मरगळ धुऊन निघण्याची एक प्रक्रियाच होय.पाऊस आला की नद्या,नाले तलावं ओसंडून वाहतात.पावसाच्या त्या सरी अंगावर घेताना फारच रोमांच वाटतो.सर्वत्र हिरवेगार सदाबहार वातावरण असते.असा हा पावसाळा लहानांपासून तर चक्क आजी-आजोबांसारख्या बड्या मंडळीनासुद्धा हवाहवासा वाटतो.अश्या या सुख समाधान आणणाऱ्या पावसाळ्यातील एक चित्तथरारक प्रसंग माझ्या आजही स्मरणात आहे.

संध्याकाळी ८-८:१५ च्या सुमारास मी ऑफिसमधून निघालो.थोडा दूरवर जाताच पावसाने हजेरी लावली.मी एका बंद दुकानाच्या छपराखाली विसावा घेतला.पाऊस धो-धो बरसत होता.जवळ जवळ २०-२५ मिनिटे झाली,पाऊस कधी कमी होईल याचा मी विचार करीतच होतो की एका लहान मुलाने मला हात लाऊन माझे लक्ष वेधले.तो संपूर्ण भिजला होता.केस वाढलेले आणि फाटके कपडे घातलेल्या त्याने माझ्याकडे पैशाची मागणी केली.मी लगेचच दुर्लक्ष केले.पण तो तरीही त्याच्या पोटाकडे हात दाखवून पैसे मागत होता.मी त्याच्याकडे बघितले.तो संपूर्ण भिजला होता.त्याच्या टपोऱ्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ होती.मी नकळतच खिशात हात घातला आणि एक पाच रुपयाचं नाण त्याला दिलं.तसाच तो धावत पळत सुटला.रिमझिमणाऱ्या पावसात ,रस्त्यावरील दिव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात तो दिसेनासा झाला.तोवर पाऊस कमी झाला होता,मला निघायला हरकत नव्हती.

साधारण १० मिनिटाचे अंतर मी पार केले.पुढे रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली.कुणी पोलिसांच्या नावे तर कुणी दवाखाना या नावाने ओरडत होते.उत्साहापोटी मीसुद्धा त्या घोळक्यामध्ये शिरलो.गर्दीतून वाट शोधत मी काहीतरी समोर दिसते काय म्हणून पुढे गेलो,तसाच मी स्तब्ध राहिलो.एक क्षण डोळ्यासमोर काळोख झाला आणि चटकन माझ्या डोळ्यांत अश्रू आले.

ज्या लहान मुलाला मी पैसे दिले होते त्याला अपघात घडला होता.एका भरधाव येण्याऱ्या वाहनाने त्याला चिरडले होते.तो जागीच ठार झाला होता.त्याचा
छिन्न-विछिन्न देह बघून यमालासुद्धा रडू कोसळले असेल.त्या क्षणी मला अपराध्यासारखे वाटत होते.मी त्याला पैसे दिले नसते तर तो धावला नसता आणि हा प्रसंग घडलाच नसता,असे मनोमनी वाटू लागले.

नेहमीच हसत-खेळत बरसणारा पाऊस सगळ्यांना सुख समृद्धी देऊन जातो पण त्याचबरोबर मला त्या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण देऊन जातो.त्या मुलाचे पाणावलेले डोळे आजही मला आठवतात.ते जणु माझ्याकडे न्याय मागत आहे असा मला भास होतो.त्या वेळी पावसाची प्रत्येक सर माझ्या अंगाला बोचत असते आणि त्या सरी मी कुठेतरी अपराधी आहे अशी जणु ग्वाही देत असतात.

जीवनसृष्ठीसाठी वरदान असलेला पाऊस दरवर्षी ठरल्याप्रमाणे येतो पण जाताना मात्र थोडे पाणी आसवांच्या रुपात माझ्या डोळ्यांमध्ये सोडून जातो.

Tuesday, October 26, 2010

मुलाखत

१९ मार्च,
माझ्या मुलाखतीचा ठरलेला दिवस.एका नामांकीत कंपनीमध्ये माझी मुलाखत होती.सकाळी १० वाजताच्या सुमारास मी तेथे पोहोचलो.साधारण ८-१० मुले-मुली होती.दोन तासानंतर माझा नंबर आला.चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देण्याची तशी ही माझी पहिलीच वेळ,त्यामुळे थोडा गोंधळलो होतोच.मुलाखतीसाठी मी आत प्रवेश केला, तोच मी स्तब्ध राहिलो.मुलाखत घेणाऱ्या दोन व्यक्ती होत्या आणि त्या दोघांमधील एक"ती" होती..............................

तिच्यासोबत मी माझ्या आयुष्यातील अविस्मरणिय क्षण अनुभवले होते.तिने एक नजर माझ्याकडे बघितले,तिचे डोळे पाणावले.माझाही श्वास दाटून आला.एका क्षणी असे वाटले की,आल्या पाऊली माघारी निघून जावे पण मी तसे करू शकलो नाही.साधारण १५-२० मिनिटांनी मी बाहेर आलो.खूप हताश झालेलो होतो.तिने मला एकही प्रश्न विचारला नव्हता,बहुदा मला बघून तिला बोलणे जमले नसावे.त्या दिवशी त्या सगळ्या आठवणी उफाळून आल्या ज्या मि मागील वर्षापासून विसरण्याचा प्रयत्न करीत होतो.

मी एफ.वाय. ला असताना ती मला भेटली.म्हणजेच दिसली.दोन महिने तिला बघण्यातच गेले.फक्त नेत्रसुख घ्यायचं आणि शांत बसायचं हाच दिनक्रम.काही दिवसांनी आम्ही बोलायला लागलो.मग नियमितच अभ्यासाबद्दल तर ट्युशनबद्दल बोलणं व्हायचं.मग पुढे आम्ही एक-मेकांच्या घरी येऊ-जाऊ लागलो.परीक्षा संपल्या.घरी तिच्या येण्या-जाण्यातून जवळीक वाढली आणि आम्ही प्रेमात पडलो.मग बाहेर फिरणे,पिक्चरला जाणे अश्या नवनवीन कारणांनी भेटणे व्हायचेच.जवळजवळ तीन वर्षे आमचे प्रेम असेच चालले.

अचानक एके दिवशी तिच्या घरी सगळं कळलं,नेहमीप्रमाणेच घरच्यांना आमच्या नात्याला विरोध होता.तिनेसुद्धा त्यांची मनबदलवणी करण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ.तिने मला भेटणे सोडले.तिच्या मैत्रिणीच्या हाताने एक शेवटचं पत्र हाती पडलं.पत्रात फक्तं दोनच वाक्य लिहिले होते.

"सगळं काही विसरून जा मी तुला विसरू शकणार नाही,मी हे सगळं माझ्या घरच्यांसाठी करते आहे.मला माफ कर.....................तुझीच "

बस्स.सगळं संपलं.

३१ ऑगस्ट.
मागील वर्षी तिचं लग्न झालं आणि आज एवढ्या दिवसांनी पुन्हा तिची भेट झाली.सगळं काही एक स्वप्नं म्हणूनच पुढे आलं.

दोनच दिवसांनी मला नोकरीवर रुजू होण्याचं पत्र मिळालं.मला कळून चुकलं होतं की,हे पत्र मला नक्कीच तिच्यामुळे मिळालं होतं.कारण मी मुलाखतीमध्ये एकही शब्द बोललेलो नव्हतो.पुन्हा एकदा मला तिच्या प्रेमाचा साक्ष्त्कार झाला होता.ती माझ्याजवळच आहे ह्याची मला जाणीव झाली होती,पण ते पत्र मी न स्वीकारण्यातच तिचं आणि माझं हीत समजलं..........................

Monday, October 25, 2010

प्रश्न


मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?
आसुसलेल्या नयनांना माझ्या ओझरते दर्शन देशील का?

तुझ्याच वेड्या धुंदीत मी रात राती जागतांना
स्वप्नात हळूच येऊन मोत्यासारख शिंपल्यात दडशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

आकंठ बुडालो तुझ्या प्रेमात मी,प्रीतीचा सहारा देशील का?
तुजसाठी कासावीस झालेल्या मनास क्षणभर विंसावा देशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

तुझ्या स्पर्शाने काहुरल्या जिवा,भेटीने तृप्त करशील का?
लाजलाजूनी चूर होतांना हळूच मजला दिसशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

इंद्रधनुचे सातही रंग तुझ्या सहवासाने उधळशील का?
पुन्हा एकदा तेच बंध जीवनात बहरवशील का?
मनी तुझे स्मरण होतांना अशी अवचित येशील का?

प्रश्न असे अनेक आहेत उत्तरे कधी देशील का?
नात्यांच्या विखुरल्या माळेला त्याच नात्याने माळ्शील का?
आपलेच ओठ आणि आपलेच श्वास सुरास देशील का?
मनी तुझे स्मरण होताना अशी अवचित येशील का?
आसुसलेल्या नयनांना माझ्या ओझरते दर्शन देशील का?

जगावेगळी


ती येते अन जाते
पण तिच्या येण्यात आणि जाण्यात काहीतरी वेगळीच मजा असते
तिच्या न येण्याने रुसलेलं मन आणि तिच्या येण्याने फुललेलं मन
यांची अवस्था काही वेगळीच असते
तिच्याकडे पाहीले कि पाहातच राहावे,
पण तिच्या नजरेतील देण वेगळंच असतं
तिच्या बोलण्याने हसून हसून खिदळून जातो मी,
तिच्या ओठांवरील स्मित हास्य काही वेगळंच असतं
आकाशातील तारे तोडून द्यावे तिच्या ओंजळीत ,
पण तिचं लुकलुकण काही वेगळंच असतं
मी रुसल्यावर तिचं मनवण,
रागावर मिश्कील हसण काही वेगळंच असतं
मी बोलत राहतो तिच्याशी भराभरा,
तिच्या मौनाचं कारण काही वेगळंच असतं
मी होय म्हणत असताना,
तिच्या मनातील होकार पण ओठांवरील नकार वेगळाच असतो
ती सोबत नसतानाही असल्याचा मनातील भाव काही वेगळाच असतो
तिच्या विरहामधेही तिलाच शोधण काहीसं वेगळंच असतं..............
वेगळ म्हणता म्हणता सगळं काही सारखंच असतं
शुण्यातून जीवनात अन जीवनातुन पुन्हा शुण्यातच जायचं असतं
आठवणीचे घेर घेरतात मग चौफेर
त्या चक्रव्युव्हाला तोडण शिकायचंच असतं
वेगळ म्हणता म्हणता सगळं काही सारखंच असतं...................

निरोप


खचलो मी,संपलो मी
शेवटचा श्वास घेतला
मृत्युशय्येत झोकुन स्वत:ला
शरीराने हा साथ सोडला................

निघाली मिरवणूक माझ्या प्रेताची
फुलं,पाकळ्या उधळीत होत्या
अश्रुंच्या जागी डोळ्यांत त्यांच्या
आनंद जणु ओसंडत होता................

हाताचे खांदे अनेक होते
साथ देणारा हात नव्हता
तुटली सारी नाती-गोती
ते जपणारा बंध नव्हता...............

रामनाम तेच होते आज
अर्थ मात्र वेगळा होता
ज्या लोकांसि भेटण्या झुरलो
अंती समुदाय तो सगळा होता..................

येता जवळ स्मशान भूमि
पाय माझे थरथरले
पेटविता शव माझे
मन मुक्तांगाने बहरले..................

अंत आहे येता मरण
जाण असते प्रत्येक जीवा
ओढ कशी ही जीवनाची
पुन्हा नव्याने जन्म हवा..................