कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Wednesday, October 27, 2010

निसर्ग

सडे सांडले किरणांचे
वरुणालाही जाग आली
मेघ गडगडले सारे
इंद्रधनुला साज आली

निसर्ग आला बहरून
कोकिळेची तान आली
काहुरल्या अतृप्त जीवा
तृप्त करण्या गंगा आली

फुलं-पाने उधळून न्हाले
रानवाटचे फुलोरे झाले
निर्मळ झाले क्षण सारे
गार वाहती आज वारे

संध्या ही फुलली प्रेमाने
आलिया नित्य नेमाने
शमले आता जीव सारे
भीती कसली रातीची रे

क्षितिजावरती किरणांचा
ओझरला रंग आता
चिमण्यांनीही धरल्या
अपुल्या घरच्या वाटा

तारका जाग्या झाल्या
चंद्रालाही जाग आली
निस्तेज होऊन सूर्याने मग
सोडली ती लाल लाली

No comments:

Post a Comment