पावसाळा म्हटला की चिंब ओलं होऊन निसर्गातील या अप्रतिम ऋतुचा आनंद घेण्याची मजा प्रत्येकाच्याच मनी असते.पाऊस म्हणजे मनातील मरगळ धुऊन निघण्याची एक प्रक्रियाच होय.पाऊस आला की नद्या,नाले तलावं ओसंडून वाहतात.पावसाच्या त्या सरी अंगावर घेताना फारच रोमांच वाटतो.सर्वत्र हिरवेगार सदाबहार वातावरण असते.असा हा पावसाळा लहानांपासून तर चक्क आजी-आजोबांसारख्या बड्या मंडळीनासुद्धा हवाहवासा वाटतो.अश्या या सुख समाधान आणणाऱ्या पावसाळ्यातील एक चित्तथरारक प्रसंग माझ्या आजही स्मरणात आहे.
संध्याकाळी ८-८:१५ च्या सुमारास मी ऑफिसमधून निघालो.थोडा दूरवर जाताच पावसाने हजेरी लावली.मी एका बंद दुकानाच्या छपराखाली विसावा घेतला.पाऊस धो-धो बरसत होता.जवळ जवळ २०-२५ मिनिटे झाली,पाऊस कधी कमी होईल याचा मी विचार करीतच होतो की एका लहान मुलाने मला हात लाऊन माझे लक्ष वेधले.तो संपूर्ण भिजला होता.केस वाढलेले आणि फाटके कपडे घातलेल्या त्याने माझ्याकडे पैशाची मागणी केली.मी लगेचच दुर्लक्ष केले.पण तो तरीही त्याच्या पोटाकडे हात दाखवून पैसे मागत होता.मी त्याच्याकडे बघितले.तो संपूर्ण भिजला होता.त्याच्या टपोऱ्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ होती.मी नकळतच खिशात हात घातला आणि एक पाच रुपयाचं नाण त्याला दिलं.तसाच तो धावत पळत सुटला.रिमझिमणाऱ्या पावसात ,रस्त्यावरील दिव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात तो दिसेनासा झाला.तोवर पाऊस कमी झाला होता,मला निघायला हरकत नव्हती.
साधारण १० मिनिटाचे अंतर मी पार केले.पुढे रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली.कुणी पोलिसांच्या नावे तर कुणी दवाखाना या नावाने ओरडत होते.उत्साहापोटी मीसुद्धा त्या घोळक्यामध्ये शिरलो.गर्दीतून वाट शोधत मी काहीतरी समोर दिसते काय म्हणून पुढे गेलो,तसाच मी स्तब्ध राहिलो.एक क्षण डोळ्यासमोर काळोख झाला आणि चटकन माझ्या डोळ्यांत अश्रू आले.
ज्या लहान मुलाला मी पैसे दिले होते त्याला अपघात घडला होता.एका भरधाव येण्याऱ्या वाहनाने त्याला चिरडले होते.तो जागीच ठार झाला होता.त्याचा
छिन्न-विछिन्न देह बघून यमालासुद्धा रडू कोसळले असेल.त्या क्षणी मला अपराध्यासारखे वाटत होते.मी त्याला पैसे दिले नसते तर तो धावला नसता आणि हा प्रसंग घडलाच नसता,असे मनोमनी वाटू लागले.
नेहमीच हसत-खेळत बरसणारा पाऊस सगळ्यांना सुख समृद्धी देऊन जातो पण त्याचबरोबर मला त्या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण देऊन जातो.त्या मुलाचे पाणावलेले डोळे आजही मला आठवतात.ते जणु माझ्याकडे न्याय मागत आहे असा मला भास होतो.त्या वेळी पावसाची प्रत्येक सर माझ्या अंगाला बोचत असते आणि त्या सरी मी कुठेतरी अपराधी आहे अशी जणु ग्वाही देत असतात.
जीवनसृष्ठीसाठी वरदान असलेला पाऊस दरवर्षी ठरल्याप्रमाणे येतो पण जाताना मात्र थोडे पाणी आसवांच्या रुपात माझ्या डोळ्यांमध्ये सोडून जातो.
No comments:
Post a Comment