कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Monday, October 25, 2010

निसर्ग आणि मन ......


नेहमीच हसत खेळत राहणारे मन
आज कोण जाणे कशाचे मौन बाळगत आहे
सूर्याचे किरणसुद्धा आज काळ्या ढगाआड
लपले आहे
कधी कधी मनाची आणि निसर्गाची व्यथा
एकच तर होत नसेल?
आसमंत पसरलेल्या निसर्गरम्य वातावरणात
आज वाऱ्याची साधी झुळुकही नाही
त्याचप्रमाणे मनही आज कुठतरी भरकटत आहे
कुठे,कशासाठी,कुणासाठी माहित नाही
बहुतेक निसर्गातील वातावरणामुळेच तर
ते व्यथित नसावे?
कळायला काहीच मार्ग नाही
कदाचित मागील काही विपरीत घडलेलं
आठवून मन स्वतःशीच उदास तर नसेल?
एका मनाची व्यथा दुसऱ्या मनाशिवाय
कोणीच जाणू शकत नाही
मन आणि निसर्ग,दोघेही मुके असतात
त्यांची मुकभाषा हि एकमेकांनाच कळत असावी
विस्तीर्ण वृक्षाची सावली उन्हाने कासावीस
झालेल्या मनाला शांती प्रदान करते
निसर्गातील निर्मल जल व्याकुळल्या मनाची
तहान भागवते
निसर्ग भरभराटीला आला कि
मनही आनंदून जाते
काय हेच ते नात आहे जे मन आणि निसर्ग
यात साम्य दर्शविते?
वडाच्या पारंब्या ज्याप्रमाणे एकाकी झुलत राहतात
त्याप्रमाणे मनाचेही तसेच होते
ते सुद्धा असेच एकाकी झुलत राहते
कोणाच्या येण्याच्या आशेने तर
कोणाच्या जाण्याच्या भीतीने
आसुसलेल्या मनाला कधी तरी एकोपा हवा असतो
कुठेतरी एकांतवासात मन फिरत राहते
निसर्गाच्या सानिद्ध्यात,पक्ष्यांच्या किलबिलाटात
कोणीतरी भेटून जात,कोणाचीतरी आठवण होते
कोणी बोलून जात तर कोणी अबोल
कोणी रडून जात तर कोणी रडवून जात
मनाच्या ह्या सगळ्या कृतीचा साक्षीदार असतो निसर्ग
त्याच्या सहवासात मन कधीच एकाकी नसते
फक्त त्याचा सहवास अनुभवायला हवा
एकाकी मनाला आपल्या मिठीत घेण्यासाठी
निसर्ग सदैव तत्पर असतो आणि जणू
साद घालीत असतो........

हे एकाकी मना,तुझे दु:ख पाहवेना
ये सानिद्ध्यात माझ्या,लुटुया निसर्गाची मजा
आज उघडून नयन,वाहुदे अश्रुधारा
वाट मोकळी कर सुखाची,विरुदे दु:खाची कला
वरद निसर्गाचा हा वर्षारुतू आला
धुऊन निघेल काळी छाया
भरभरून बरसेल निसर्गाची माया.

No comments:

Post a Comment