कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Tuesday, October 26, 2010

मुलाखत

१९ मार्च,
माझ्या मुलाखतीचा ठरलेला दिवस.एका नामांकीत कंपनीमध्ये माझी मुलाखत होती.सकाळी १० वाजताच्या सुमारास मी तेथे पोहोचलो.साधारण ८-१० मुले-मुली होती.दोन तासानंतर माझा नंबर आला.चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देण्याची तशी ही माझी पहिलीच वेळ,त्यामुळे थोडा गोंधळलो होतोच.मुलाखतीसाठी मी आत प्रवेश केला, तोच मी स्तब्ध राहिलो.मुलाखत घेणाऱ्या दोन व्यक्ती होत्या आणि त्या दोघांमधील एक"ती" होती..............................

तिच्यासोबत मी माझ्या आयुष्यातील अविस्मरणिय क्षण अनुभवले होते.तिने एक नजर माझ्याकडे बघितले,तिचे डोळे पाणावले.माझाही श्वास दाटून आला.एका क्षणी असे वाटले की,आल्या पाऊली माघारी निघून जावे पण मी तसे करू शकलो नाही.साधारण १५-२० मिनिटांनी मी बाहेर आलो.खूप हताश झालेलो होतो.तिने मला एकही प्रश्न विचारला नव्हता,बहुदा मला बघून तिला बोलणे जमले नसावे.त्या दिवशी त्या सगळ्या आठवणी उफाळून आल्या ज्या मि मागील वर्षापासून विसरण्याचा प्रयत्न करीत होतो.

मी एफ.वाय. ला असताना ती मला भेटली.म्हणजेच दिसली.दोन महिने तिला बघण्यातच गेले.फक्त नेत्रसुख घ्यायचं आणि शांत बसायचं हाच दिनक्रम.काही दिवसांनी आम्ही बोलायला लागलो.मग नियमितच अभ्यासाबद्दल तर ट्युशनबद्दल बोलणं व्हायचं.मग पुढे आम्ही एक-मेकांच्या घरी येऊ-जाऊ लागलो.परीक्षा संपल्या.घरी तिच्या येण्या-जाण्यातून जवळीक वाढली आणि आम्ही प्रेमात पडलो.मग बाहेर फिरणे,पिक्चरला जाणे अश्या नवनवीन कारणांनी भेटणे व्हायचेच.जवळजवळ तीन वर्षे आमचे प्रेम असेच चालले.

अचानक एके दिवशी तिच्या घरी सगळं कळलं,नेहमीप्रमाणेच घरच्यांना आमच्या नात्याला विरोध होता.तिनेसुद्धा त्यांची मनबदलवणी करण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ.तिने मला भेटणे सोडले.तिच्या मैत्रिणीच्या हाताने एक शेवटचं पत्र हाती पडलं.पत्रात फक्तं दोनच वाक्य लिहिले होते.

"सगळं काही विसरून जा मी तुला विसरू शकणार नाही,मी हे सगळं माझ्या घरच्यांसाठी करते आहे.मला माफ कर.....................तुझीच "

बस्स.सगळं संपलं.

३१ ऑगस्ट.
मागील वर्षी तिचं लग्न झालं आणि आज एवढ्या दिवसांनी पुन्हा तिची भेट झाली.सगळं काही एक स्वप्नं म्हणूनच पुढे आलं.

दोनच दिवसांनी मला नोकरीवर रुजू होण्याचं पत्र मिळालं.मला कळून चुकलं होतं की,हे पत्र मला नक्कीच तिच्यामुळे मिळालं होतं.कारण मी मुलाखतीमध्ये एकही शब्द बोललेलो नव्हतो.पुन्हा एकदा मला तिच्या प्रेमाचा साक्ष्त्कार झाला होता.ती माझ्याजवळच आहे ह्याची मला जाणीव झाली होती,पण ते पत्र मी न स्वीकारण्यातच तिचं आणि माझं हीत समजलं..........................

1 comment:

  1. दोघांनीही आपापलं "कर्तव्य" केलत..

    कर्तव्याला चुकता माणूस, माणूस ना उरतो...

    शुभेच्छा!

    ReplyDelete